चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे तथा कवी चंद्रशेखर (जन्म : नाशिक-महाराष्ट्र, २९ जानेवारी १८७१; -
नाशिक मध्ये गोदावरीच्या तीरी तील भंडारेश्वर महादेवा शेजारी त्यांच्या घराण्याचं वडिलोपार्जित घर होतं. तिथे २९ जानेवारी १८७१ रोजी त्यांचा जन्म झाला.
त्यांचा वडिलांचे नाव शिवराम रामकृष्ण आईचे नाव म मणिकर्णिनिकाबाई होते.त्यांना आधी वामाराव आणि नारायणराव हे पुत्र झाले आणि नारायणरावांच्या नंतर वीस वर्षांनी कवी चंद्रशेखर यांचा जन्म झाला. ते शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण होते.
त्यांचे मराठी शिक्षण दाजी पंतोजी यांच्या गावातील शाळेत झाले आणि नाशिक मधील सरकारी नंबर ३ या शाळेत झाले. पाचवी इयत्ता मराठीत उत्तीर्ण झाल्यानंतर ते इंग्रजी शिकण्यासाठी नाशिक हायस्कूलला जाऊ लागले.
त्यांच्या कवितालेखनची सुरुवात कशी झाली याचा ही एक सुंदर किस्सा आहे . ते शाळेला सुट्टी लागल्यानंतर सिन्नरला आपल्या नातेवाईकांकडे गेले होते त्यावेळी सिन्नर हे बागायतदार क्षेत्र होतं तिकडंचा , निसर्ग खूप सुंदर होता, मनाला भावणारा असा होता आणि अशा वातावरणात त्यांचं कवी मन जागं झालं आणि ते गुणगुणायला लागेले आणि त्यांनी आपला पहिला स्तोत्र हा त्यावेळी लिहून काढला तो असा होता.
' नारायणा शरण त्या करुणालया मी '
त्यांनी ते स्तोत्र त्यांचे काका म्हणजेच गोपूतात्यां यांना वाचून दाखवले. गोपूतात्यांना ते खूप आवडले आणि त्यांनी कवी चंद्रशेखर यांच्या पाठीवरती शाब्बासकीचा हात फिरवला आणि तू नक्की कधी होशील अशी शाब्बासकी दिली.
पुढे त्यांचे इंग्रजी शिक्षण बडोदा हायस्कूल आणि त्यानंतर विश्राम बागेतील पुणे हायस्कूल येथे झाले.
असेच निवांत बसले होते तेव्हा वसंताची सुरुवात झाले होते कोकिळेचे स्वर तेव्हा सर्वत्र घुमायला लागले होते आणि तो कोकिळेचा स्वर त्यांच्या मनाला मोहून टाकत होता, आणि यामुळेच त्यांचं कविमन पुन्हा जाग झालं आणि त्यांनी आपली पहिली कविता " कोकील " ही रचली आणि ती १८ मे १८९५ रोजी एका अंकात प्रकाशितही झाली .
त्यांचे शिक्षण झाल्यावर तिथे पुढे नोकरीधंद्या निमित्त अमदाबाद ला गेले.पण तिकडे त्यांचे कामात मन लागत नव्हते ते कवितेच्या विश्वास हरवत चाललेले होते. त निमूटपणे अमदाबाड हून बडोद्याला आले व त्यांचे बंधू नारायणराव यांच्या कडे राहिले. त्यांना बर्याचशा भाषांचे ज्ञान होतं त्यामुळे तिथे त्यांना सरकारी ऑफिसात कारकुनाची नोकरी मिळाली. प्रथम त्यांनी दिवाण कचेरीत एक वर्ष हंगामी कारकुनाचे काम केले आणि नंतर लगेच त्यांना राज्यातील चीफ मेडिकल ऑफिसर यांनी आपल्या कचेरीत बोलून घेतले.
याच वेळी त्यांचा कविवर्य दत्तात्रेय कोंडो यांच्याशी परिचय घडून आला . आणि त्यांच्या साहित्यिक बरकतीचा काळ सुरू झाला.
चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशी कविता त्यांनी लिहिली. इंग्रजी कवितेचे वाचनमनन त्यांनी केलेले असले, तरी तिच्यातील स्वच्छंदतावादी संप्रदायाचे त्यांना आकर्षण नव्हते मात्र मिल्टनसारखा विदग्ध, व्यासंगी कवी त्यांना जवळचा वाटत होता. कवितेतून आत्मलेखन करणे त्यांना मान्य नव्हते. कवितेने ज्ञान आणि रस ह्यांचा एकात्म अनुभव द्यावा, अशी त्यांची काव्यविषयक भूमिका होती आणि ह्या भूमिकेतून त्यांनी काव्यकलेची आजीव आणि निष्ठापूर्वक उपासना केली. पंडीत कवींचे अलीकडच्या काळातील एक ज्येष्ठ प्रतिनिधी, असे त्यांना यथार्थपणे म्हटले जाते. ‘गोदागौरव’ आणि ‘कविता-रति’ ह्या त्यांच्या विशेष उल्लेखनीय कविता. ‘गोदागौरवा’चे नादमाधुर्य जयदेवाच्या गीतगोविंदाची स्मृती करून देते. ह्या दोन्ही कवितांतील— विशेषतः ‘कविता-रति’ मधील –आत्मपरता चंद्रशेखरांच्या कवितेत अपवादभूत आणि म्हणून विशेष लक्षणीय आहे. कवी म्हणून त्यांची कीर्ती प्रामुख्याने चंद्रिका (१९३२) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहावर अधिष्ठित आहे. ह्या संग्रहास लाभलेल्या यशामुळेच बडोदे संस्थानाचे राजकविपद त्यांना मिळाले.
त्यांनी काही उत्कृष्ट रूपांतरेही केली. मिल्टनच्या इल् पेन्सरोझो आणि ल’ आलेग्रो ह्या काव्यांची अनुक्रमे ‘चिंतोपंत उदास’ आणि ‘रंगराव हर्षे’ ह्या नावांनी त्यांनी केलेली रूपांतरे, तसेच ‘काय हो चमत्कार’ हे एका इंग्रजी बॅलडचे रूपांतर ह्या संदर्भात उल्लेखनीय ठरतात.
ह्यांशिवाय ‘उगडं गुपित्’ व किस्मतपूरचा जमीनदार (१९३६) ही स्वतंत्र कथाकाव्ये त्यांनी लिहिली असली, तरी ती फारशी मान्यता पावली नाहीत.
त्यांची साहित्यिक संपदा ही पुढील प्रमाणे आहेत
अर्वाचीन कविता
उघडं गुपित (कथाकाव्य)
कविता रति
किस्मतपूरचा जमीनदार (कथाकाव्य-१९३६)
गोदागौरव (स्तोत्रकाव्य)
चंद्रिका (स्फुट कवितांचा काव्यसंग्रह -१९३२)
चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल पेन्सरोझोचे मराठी रूपांतर)
चैतन्यदूत (दीर्घकाव्य)
धनगर (दीर्घकाव्य)
रंगराव हर्षे (मिल्टनच्या ल' आलेग्रो ह्या काव्याचे मराठी रूपांतर
स्वदेशप्रीती (दीर्घकाव्य)
पुढे त्यांची एक रचना आणि त्याचे रसग्रहण हे आपल्या समोर मी देत आहे .
समरमहिमा
ही कविता कवीने रणभूमी ही विरपत्नी साठी उद्देशून बोलत आहे या अर्थाने लिहिली आहे . कवी चंद्रशेखर आपल्या पहिल्या ओळीत म्हणतात की
आली तटस्थ झाली, थरके अधरोष्ठ, आंसवें गळती ।
रणदेवताही झाली त्या वीरस्त्रीसमोर विरघळती ।।१।।
याचा ओळींचा अर्थ असा होतो की ती वीर पत्नी तटस्थपणे उभी राहिली आहे . तिचे ओठ थरथर कापतात आणि आता तिची आसवे ही गळायला लागलेली आहेत. ही रण देवताही त्या वीर स्त्रीच्या दुःखामुळे आता स्वतःही दुःखी झाली आहे .
'बाई' तिला म्हणे ती, पदराने टिपुनी नयनवारीतें ।
'सांगू काय तुला मी आले कामास कारभारी ते! ।।२।।
या ओळींचा अर्थ असा आहे की आता रण देवताही त्या वीर पत्नीच्या संत्वणासाठी बाकी आलेली आहे आपल्या पदराने ते तिचे अश्रू टिपून घेत आहे. पण रण देवतेला आता काळात नहीये की त्या वीर पत्नीला कसं सांगावं की तिचे स्वामी आपलं कर्तव्य निभवताना त्यांना वीर मरण आलेल आहे.
पंचाननापरी गे परचक्रावरी तुटोनी तो पडला ।
असहाय! काय करितो? लढला, लढला, थकोनियां पडला! ।।३।।
या ओळींचा आर्थ असा आहे की वीर शत्रूवर सिन्हा सारखा तुटून पडला पण रणांगणात शेवटी तो खूप थकला आणि शेवटी असहाय झाला आणि लढाता लढता त थकले जमिनीवर पडला
पडला गे पडला तो वीर रणी धूलिमाजी पडलाहे ।
कज्जलमिश्रित अश्रू हीच तया तूं तिलांजली वाहे ।।४।।
या ओळीचा आर्थ असा आहे की तो शुर वीर आता निपचित होवून जमिनीवर पडलेला आहे .. आणि तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या काजळ मिश्रित अश्रू हेच तिने त्यांना वाहिलेली तिलांजली आहे
विद्युत्प्राय सभोती चमकत असता सुतीव्र तरवारी ।
त्यांतुनी अचल उभा तो, पर्वतगर्व स्वनिश्चयें हारी ।। ५।।
या ओळींचा अर्थ असा आहे की विजेच्या सारख्या लखलखनाऱ्या तलवारी ससभोवतली चमकत असताना ही तो वीर निर्धास्त त्यांच्या समोर उभा राहिला होता त्याला तसं पाहून पर्वताचा गर्व ही त्याच्या पुढे फिका पडला होता.
जे संग्रामधुरंधर रिपुसंहारार्थ करिती घोर रण ।
त्या वीरांते यावे, तैसे सन्मान्य यास ये मरण ।।६।।
या ओळींचा अर्थ आसा आहे की रणांगणात शत्रुच्या संहारासाठी तो वीरा प्रमाणे लढला आहे . आणि लढता लढता त्याला वीर मरण आलं आहे .
तद्वेश केशरी तो, झालाहे चिवट मेणकापडसा ।
चढुनी पुटे रुधिराची नुमजे होता तयास रंग कसा ।।७।।
या ओळींचा अर्थ असा आहे की त्याचा वेश हा केसरी झालं आहे. त्याचे कपडे मेणा सारखे रक्ताने चिकट झाले आहेत. त्याच्या कपड्यांवर रक्ताचे एवढे डाग पडले आहेत ही त्या कपड्यांचा मूळ रंग आता ओळखता येत नाही ये.
जेथे देह तयाचा गळला, तेथे तयास तुटवोनी ।
राऊत बहू पडले, शतावधी अरिशिरांस उडवोनी ।। ८।।
या ओळींचा अर्थ आसा आहे की शेकडो शत्रूंचे मुंडके उडवल्या नंतर त्यांचा देह शेवटी रणांगणात निपचीत पडला.
अपुल्या प्रिय देशास्तव वीर जसा पाहिजे रणी लढला ।
लढला तसाच तोही, पाहुनी शतशें रिपू स्वयें पडला ।।९।।
या ओळींचा अर्थ आसा आहे की तो वीर आपल्या प्रिय देशासाठी विरा प्रमाणे लढला जरी त्याच्या समोर शेकडो शत्रू होते.
गृंध्रादिक आकाशी घिरट्या जे घालिती प्रभाती ते ।
त्वप्रियजनदेहावरी करितिल उदईक मेजवानीते ।।१०।।
या ओळींचा अर्थ आसा आहे की आज आकाशात जे गिधाडे घिरक्या घालत आहेत ते उद्या युद्धात शहीद झालेले जे वीर होते हे या विरास प्रिय होते पण आता ती गिधाडे त्या वीरांच्या देहाचे लागते लचके अन लचके तोडून मेजवानी करतील
हे वीरवल्लभे तूं संतत करशील शोक बहू त्याचा
कवी गातील तयाचा महिमा तत्प्राणहारिं समराचा ।। ११।।
या ओळींचा अर्थ असा आहे की हे वीर पत्नी तू त्या विराचा रोज शोक करशील पण त्यांची महिमा कवी आपल्या कवितेतून सादर करतील त्यांनी दिलेले बलिदान वाया जाणार नाही त्यांचं कर्तृत्व हे अखंड जिवंत राहील
या कवितेत कवी चंद्रशेखर यांनी किती सुंदर पने रणभूमीचे आणि त्या रणभूमी साठी लढलेल्या त्या विरचे चित्र रेखाटले आहे.. आपल्या पतीच्या दुःखात चिंब बुडलेल्या वीर पत्नीचे दुःख ही किती सुंदर रित्या मांडलं आहे... किती जिवंत पणा आहे त्याच्या लिखाणात.... आज त्यांची जयंती आहे त्यांना लाख लाख वंदना देतो आणि तूर्तास इथेच थांबतो धन्यवाद. ..
( सतिष अहिरे )
तुमचे खूप खूप आभार
ReplyDeleteGreat
ReplyDeleteThank you so much
DeleteThank you so much
ReplyDeleteखुपच छान सतीश!
ReplyDeleteआपले खूप खूप आभार
Deleteखुप छान
ReplyDeleteThank you so much
Delete