प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म१९४३
सुल्लाळी, उस्मानाबाद मध्ये झाला होता व मृत्यू
जानेवारी ६, २०१० झाला होता .
(आता हे गाव लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात आहे)
लहानपणी डोईवरचे माता-पित्याचे छत्र हरवले असले तरी, बहिणीने त्यांचा सांभाळ केला. गुरे-ढोरे वळतच त्यांची शाळा चालू होती. महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयात झाले. त्यानंतर ते मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून त्यांनी एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केले.
प्रा. सोनकांबळे सुरुवातीला गल्ले बोरगाव येथे शिक्षक म्हणून नोकरीला लागले. इ.स. १९६६ मध्ये ते डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. व पुढे त्याच विभागाचे प्रमुख झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्यपद आणि इ.स. १९८८ मध्ये प्राचार्यपदही त्यांनी भूषविले. तेथूनच ते निवृत्त झाले.
साहित्य व सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. कोणत्याही कार्यक्रमाला प्रा. सोनकांबळे गेले की ते तेथील व्यक्तींना आपल्या खिशातली फुले व खडीसाखर देत. एक सहृदयी आणि प्रेमळ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती.
त्यांनी नाटक, साहित्य
चळवळ दलित साहित्य, मराठी साहित्य यात आपले मोलाचे योगदान दिले त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती
आठवणींचे पक्षी हे आहे .
प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांना आपल्या जीवन काळात
साहित्य अकादमी पुरस्कार(१९८३)
आदर्श शिक्षक पुरस्कार(१९९७)
'बेस्ट सिटिझन' हे पुरस्कार प्राप्त झाले.
औरंगाबादमधील तिसऱ्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते तसेच
मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील झाले होते.
प्रा. सोनकांबळे यांना साहित्य अकादमीचा १९८३मध्ये पुरस्कार मिळाला.
राज्य शासनानेदेखील पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला आहे.
लातूर नगरपरिषदेने प्रा. प्र. ई. सोनकांबळे यांचा भूमिपुत्र म्हणून विशेष सत्कार केला होता.
अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रा. सोनकांबळे यांना प्रदान करण्यात आला होता.
रयत शिक्षणसंस्थेचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (१९९७)
आठवणींचे पक्षी : प्र. ई. सोनकांबळे यांचा आत्मकथनात्मक आठवणींचा लेखसंग्रह. दलित साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मकथन म्हणून ते ओळखले जाते. जीवनातील खडतर जातवास्तवाचे अनुभव प्र. ई. सोनकांबळे यांनी या लेखसंग्रहातून मांडले आहेत. या आत्मकथनात दलित जीवनाच्या मूलगामी दुःखाचे चित्रण येते. प्र. ई. सोनकांबळे यांच्या बालपणाची आणि शिक्षण काळातील हाल-अपेष्टांचे दर्शन प्रामुख्याने या आत्मकथनामध्ये घडते.१९६४ साली मिलिंद महाविद्यालयाच्या वार्षिकांकात प्रथमतः या आत्मलेखनातील लेख प्रसिद्ध झाला.म.ना.वानखेडे यांच्या प्रोत्साहनामुळे हे लेखन घडले असल्याचे सोनकांबळे सांगतात.आरंभी यात १५ लेख होते. नंतरच्या आवृत्तीत ही संख्या २८ झालेली आहे.
आई मेल्यानंतर पोरका झालेला ‘परलाद’ ते प्राध्यापक व्यवसायात पडलेले प्र. ई.सोनकांबळे असा विस्तृत जीवनपट या आत्मकथनामध्ये मध्ये आहे.बालपणापासून कष्ट ते बहिणीकडे आश्रित म्हणून राहत असताना पडेल ती कामे करण्याचा जीवनाभुव त्यात आहे.अत्यंत गरीब परिस्थितीमुळे चिंचोके, मृत जनावरांचे मांस त्यांना खावे लागले आहे. चतकोर भाकरीसाठी मेलेले कुत्रेही ओढून टाकावे लागले आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी प्र. ई. सोनकांबळे यांना अनेक लहान-मोठी कामे करावी लागली आहेत. महारोगी म्हातारीच्या ताटलीत जेवण्याचा आणि संडासमागे जाऊन भाकरीचा तुकडा खाण्याचा मन विषण्ण करणारा प्रसंगही यात आहे.अस्पृश्य समाजात जन्माला आल्याने सोनकांबळे यांना वारंवार अपमान, अवहेलना सहन करावी लागली आहे.जातीयता आणि आर्थिक विषमतेवरचे खोलवरचे चित्रण या आत्मकथनात आहे.जातीयतेच्या -उपेक्षेच्या आणि अवहेलनेच्या असंख्य अडचणीतून जीवनसंघर्षाचे रूप या आत्मकथनातून प्रकटले आहे.
मराठवाड्यातील उदगीर भागातील बोलीचा वापर, हा या आत्मकथनाचा महत्त्वाचा विशेष आहे. बोली भाषेमुळे यातील आठवणींना जिवंतपणा प्राप्त झालेला आहे. सोनकांबळे यांच्या अनुभवविश्वाला साजेशी ही भाषा असून कोणताही संकोच न बाळगता मोठ्या धिटाईने व मोकळेपणाने त्यांनी आठवणींचे कथन केले आहे. प्रचंड अन्याय सोसूनही सोनकांबळे कोणाविषयी मनात अढी बाळगत नाहीत. उलट मदत करणाऱ्या सहानभूती दाखविणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख ते अतिशय नम्रपणे करतात.आत्मकथनाचे अकरा भारतीय भाषांत भाषांतरही झाले आहे.
( सतीष अहिरे )
Thanks dear
ReplyDeleteखुप छान
ReplyDelete